सागर जगदाळे
Bhigwan : भिगवण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात सुमारे १० लाख रुपये खर्च करून बांधलेली अंगणवाडीची इमारत धूळ खात पडून आहे. नवीन इमारत उभारण्यात आलेली असतानाही अद्याप त्याचा वापर सुरू न झाल्याने विद्यार्थी हिरमुसले आहेत, तसेच पालकही नाराज झाले आहेत. Bhigwan

येथील अंगणवाडी क्रमांक १, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे. लहान मुलांचे शिक्षण, पोषण आणि आरोग्य संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य येथे चालते. साधारणतः एक वर्षापूर्वी अत्यंत देखणी इमारत उभारण्यात आली असून त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही इमारत धूळ खात पडली आहे.
सुसज्ज इमारती असूनही विद्यार्थी दुसरीकडे पत्र्याच्या खोल्यांमध्ये शिक्षण घेत आहेत, ज्यामुळे गैरसोय होत आहे. जुन्या इमारतीच्या आसपास गवत आणि कचरा साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना उघड्यावरच जावे लागत असल्याने मुतारीचीही अडचण भासत आहे.
पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना नवीन, सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करून रंगीत वर्ग, खेळणी आणि स्वच्छ परिसर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
“नवीन इमारतीमध्ये अंगणवाडी सुरू करण्याचे काम भिगवण ग्रामपंचायतीचे आहे. त्यास काही अडचण नाही; लवकरच नवीन इमारतीत अंगणवाडी सुरू केली जाईल. देखभाल आणि दुरुस्तीचे काम देखील ग्रामपंचायतकडे आहे. अद्याप उद्घाटन झालेले नाही. ग्रामपंचायतने तात्काळ नवीन अंगणवाडी सुरू करावी, अन्यथा आम्ही येऊन सुरू करून देऊ,” असे विलास बंडगर, विस्तार अधिकारी (एकात्मिक बाल विकास विभाग, पं.स.इंदापूर) यांनी स्पष्ट केले.
याबाबत ग्रामपंचायतकडूनही माहिती देण्यात आली आहे की, “ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये उद्या ठराव घेऊन तो पास केल्यानंतर येथे दोन-तीन दिवसांत अंगणवाडी खोलीचे उद्घाटन करून सुरू करण्यात येईल,” असे ग्रामसेवक दत्तात्रय परदेशी यांनी सांगितले.






