पुणे: पुण्यातील पाषाण परिसरात मध्यरात्री (Pune Crime) घडलेल्या हल्ल्याने वाढत्या दादागिरीच्या प्रवृत्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगरमधील गणेश मंदिराजवळ रिअल इस्टेट व्यवसायिक सौरभ धनंजय जाधव (वय 26) आणि त्यांचा मित्र नागेश कांबळे गप्पा मारत थांबले असताना तिघांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. (Latest Marathi News)

सौरभ जाधव हे ‘मीनाक्षी इंटरप्रायझेस’ या नावाने रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. परिसरात विकासकामे आणि व्यवहारांमुळे त्यांची ओळख आहे. त्या रात्री दोघे मित्र नेहमीप्रमाणे बोलत उभे असताना मोटारसायकलवरून तिघे युवक तेथे आले. सुरुवातीला त्यांनी शिवीगाळ करत पुढे काढता पाय घेतला; मात्र काही अंतरावर जाऊन पुन्हा वळून ते जाधव यांच्यासमोर उभे राहिले. “आम्ही पाषाणचे बाप आहोत, आज तुला मारून टाकतो,” अशी धमकी देत त्यापैकी एकाने हातातील लोखंडी हत्याराने वार केला.
जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता खाली वाकत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही लोखंडी हत्यार डोक्याच्या मागील बाजूस लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पुढे जाताना त्यांनी एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी संस्कार दीपक निम्हण (वय 19), संग्राम राहुल ढमाले (वय 20) आणि अमर चौधरी (वय 19) यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांनी ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तक्रार नोंदवली.
पाषाण आणि आसपासच्या भागात अलीकडच्या काळात तरुणांकडून होणाऱ्या अशा दादागिरीच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे. विकासकामांमुळे झपाट्याने बदलणाऱ्या या भागात वैयक्तिक वाद, व्यावसायिक स्पर्धा किंवा केवळ वर्चस्व सिद्ध करण्याच्या मानसिकतेतून असे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी घडलेला हा हल्ला नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही चिंताजनक ठरतो.







