पुणे: भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवून (Mumbai-Pune Bullet Train) आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्पष्ट केले. वाढती लोकसंख्या, प्रवाशांची संख्या आणि शहरीकरण यामुळे रेल्वेवरील ताण प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर क्षमता वाढवणे, प्रवास अधिक वेगवान करणे आणि सुविधा सुधारणे हे या निर्णयामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेल्वेसाठी 2.78 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन मार्ग, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. देशभरातील 1300 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यापैकी 180 स्थानके पूर्ण झाली आहेत, तर 500 स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 75 मोठ्या स्थानकांवर ‘होल्डिंग एरिया’ उभारले जात आहेत.
महाराष्ट्राच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी 3000 कोटी रुपयांचे अनुदान दिल्यामुळे दररोज लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच 238 नवीन स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल गाड्या तयार केल्या जात आहेत, ज्यामुळे सुरक्षितता वाढणार आहे. मुंबई, पुणे यांसह 48 शहरांमध्ये रेल्वे क्षमता वाढवण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आणि टर्मिनल्स उभारले जात आहेत.
वेगवान प्रवासासाठी बुलेट ट्रेन प्रकल्पांनाही गती दिली जात आहे. मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे हा प्रवास सुमारे 48 मिनिटांत पूर्ण होईल, तर पुणे-हैदराबाद मार्गावर हा वेळ सुमारे 2 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यवसाय, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या स्थानकांसाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून 17 उड्डाणपूल आणि 19 भुयारी मार्ग उभारले जात आहेत.
या सर्व बदलांमुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि परवडणारा होण्यास मदत होणार असून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि शहरी विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.






