Pune News : रांजणगाव गणपती/प्रतिनिधी – मार्च महिन्याचा आज अखेरचा दिवस असल्याने शिरूर तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांमध्ये पीक कर्ज भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. 31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळतो, म्हणून सभासद शेतकरी पैशांची जुळवाजुळव करून बँकेकडे धाव घेत आहेत.

पुणे जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना थेट गावागावात सेवा पुरवली जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांची खाती याच बँकेत असल्यामुळे आणि कर्ज प्रक्रिया अतिशय सोपी असल्याने शेतकरी या बँकेला प्राधान्य देतात. सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून बँकेची सेवा तळागाळापर्यंत पोहोचली आहे. सध्या बचत गटापेक्षा पीक कर्ज घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे.
सभासद शेतकरी साधारणपणे एप्रिल महिन्यात नवीन कर्ज उचलतात आणि पुढील वर्षी मार्च महिन्यात त्याची परतफेड करतात. व्याजमुक्त कर्ज आणि कमी आर्थिक भार यामुळे दिवसेंदिवस पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
31 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ मुद्दल रक्कम भरल्यास व्याजाचा ताण टाळता येतो आणि नवीन कर्जही लवकर उपलब्ध होते, अशी माहिती जिल्हा सहकारी बँकेच्या रांजणगाव गणपती शाखेचे शाखाप्रमुख विकास नवले यांनी दिली.





