Crime News : सातारा : सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाल जिल्हा परिषद गटात घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांच्यावर हल्ला केला. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शन करून घरी परतत असताना ही घटना घडली. आरोपानुसार, काही जण इनोव्हा गाडीतून आले, त्यांनी चोरेकर यांची गाडी अडवली आणि त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चोरेकर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मारहाणीमागे पाल जिल्हा परिषद गटातील राजकीय वर्चस्वाचा वाद कारणीभूत असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते तक्रार देण्यासाठी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले. माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली.
उद्या पाल जिल्हा परिषद गटासाठी मतदान होणार आहे. त्याआधीच ही घटना घडल्याने भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणात उंब्रज पोलीस पुढे कोणती कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






