पुणे: पुणे शहरासह राज्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा आज होत आहे. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेच्या प्रांगणात परतणार असले तरी, केवळ ‘स्वागत’ आणि ‘उत्सव’ यापलीकडे विद्यार्थ्यांपुढे नवीन अभ्यासक्रमाचे, तर शिक्षकांपुढे बदलत्या शैक्षणिक पद्धतींचे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे आव्हान असणार आहे.

उन्हाळी सुट्ट्यांमुळे शांत झालेल्या शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजून उठणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंददायी अनुभव मिळावा, यासाठी शहरातील अनेक शाळांनी विशेष नियोजन केले आहे. प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट, फुग्यांचे तोरण आणि रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शाळास्तरावर सुंदर नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाबपुष्प, मिठाई वाटप करून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील शाळा सज्ज असल्याची माहिती विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांत, विशेषतः कोरोना काळात, शिक्षणाचे स्वरूप बदलले असून डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित न करता, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा ओळखून त्यांना वैयक्तिक लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
आजच्या घडीला शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञान देण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून नव्या शैक्षणिक धोरणांमुळे अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये होणारे बदल शिक्षकांना आत्मसात करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा शाळेबद्दल प्रेम आणि अभ्यासाची आवड निर्माण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.





