लोणी काळभोर, ता. 13: घरातून रागातून गेलेल्या बारावीच्या विद्यार्थिनीचा विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आळंदी म्हातोबाची (Alandi Mhatoba) (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पानमळा परिसरात घडली असून, शनिवारी (ता.13) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आदिती मोहन जवळकर (वय – 17) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदिती जवळकर हिला शनिवारी सायंकाळी घरातील मंडळी ओरडले होते. याचा राग मनात घरून आदिती ही सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराला बाहेरून कडी लावून निघून गेली होती. तिच्या घरच्यांना वाटले थोड्या वेळाने येईल. पण ती खूप वेळ झाला तरी घरी आली नाही. त्यानंतर अदितीच्या घरच्यांनी शेजाऱ्याकडून घरची कडी उघडून तिचा शोध घेतला, परंतु, ती रात्री साडेनऊ वाजेपर्यंतही घरी परतली नव्हती.
दरम्यान, काही नागरिकांना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आदिती विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आली. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस हवालदार अशोक कोल्हे, वैभव खोत, प्रसाद ताम्हाणे, उदमले व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने आदितीला विहिरीतून बाहेर काढले. तेव्हा ती निचपीत अवस्थेत पडली होती.
आदितीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.







