मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Politics) घणाघाती टीका करताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजप हळूहळू एकनाथ शिंदे यांचा पक्ष पूर्णपणे गिळंकृत करेल आणि निवडणुकीपूर्वी या पक्षाचे अस्तित्व संपवून टाकेल, असा दावा त्यांनी केला. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे हा भाजपचा अजेंडा आहे. दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होणे हे सरकारसाठी लांछनास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोलताना राऊत यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या कारखान्यांवरून सरकारला धारेवर धरले. फडणवीस ज्या गुंतवणुकीच्या गप्पा मारतात, ती गुंतवणूक म्हणजे हे ड्रग्जचे कारखाने आहेत का? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाचे धागेदोरे सत्ताधाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचले असून, एका उपमुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव यात आल्यामुळे तातडीने एसआयटी चौकशी करावी.
अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, केवळ स्वतःची आणि कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी ते अमित शाह यांच्या सोबत आहेत, ही त्यांची वैयक्तिक मजबुरी आहे.
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, सरकार आल्यापासून १५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. लोक किडनी विकून जगण्याची वेळ आली असताना उपमुख्यमंत्री शिंदे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या १० हजार कोटींच्या बजेटमधून प्रत्येक उमेदवाराला १० कोटी रुपये वाटून लूट करत आहेत.






