गुजरात: गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात (Accident News) पुण्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून वेगाच्या अतिरेकाची किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, याचे हे आणखी एक हृदयद्रावक उदाहरण ठरले आहे. इंदूर-अहमदाबाद महामार्गावरील लिमखेडा तालुक्यातील धेडेला गावाजवळ बुधवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अभिषेक यादव (26), सचिन बिरादार (27) आणि चालक तेजस दगडे (26) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही पुण्यातील रहिवासी होते. गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि इतर पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी ते नव्या कोऱ्या महिंद्रा XUV 3XO या SUV मधून प्रवास करत होते. रात्रीचा प्रवास, महामार्गावरील वेग आणि पुढे आलेले वळण यांचा संगम प्राणघातक ठरला.
धेडेला गावाजवळील वळणावर गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि SUV रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला जोरात धडकली. धडक इतकी प्रचंड होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. इंजिन तुटून सुमारे 50 फूट दूर फेकले गेले. गाडीचे छत आणि पुढील भाग पूर्णपणे नष्ट झाला होता; घटनास्थळी केवळ सांगाडा उरल्याचे दृश्य होते. धडकेनंतर वाहन पलटी होऊन सुमारे 20 फूट अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन कोसळले.
अपघाताच्या वेळी तिघेही गाडीतून दूर फेकले गेले. दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. चालक गाडीत अडकून पडला होता. स्थानिकांनी मोठा आवाज ऐकून तात्काळ धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी कटरच्या साहाय्याने दरवाजा कापून चालकाला बाहेर काढले, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासानुसार वाहनाचा वेग 120 किमीपेक्षा जास्त असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी वळण असले तरी रात्रीच्या अंधारात आणि जास्त वेगामुळे चालकाला वेळेवर नियंत्रण मिळवता आले नसावे, असा अंदाज आहे. या अपघातामुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पर्यटनासाठी निघालेला आनंदाचा प्रवास काही क्षणांत शोकांतिका ठरला.







