छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट इशाराच दिला. (Maharashtra Politics)

प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या माझ्याकडे 22 पेक्षा जास्त प्रकरणांची माहिती आली आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या नादाला लागू नका. मी अजून त्या प्रकरणांत हात घातलेला नाही, पण गरज पडली तर सर्व उघड करेन.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जरांगे यांनी पुढे आरोप करत म्हटले की, “घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक उचकवले जात आहेत. आम्ही संपूर्ण माहिती घेत आहोत. तुमची लाभार्थी टोळी माझ्याविरोधात कशी लावली गेली, हे मला ठाऊक आहे. अजूनही वेळ आहे, सावध व्हा.” त्यांनी नागपूरमधील एका महिलेचा उल्लेख करत, तिच्याकडून गंभीर माहिती मिळाल्याचा दावा केला.
“माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, त्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल केले तर आरोप करणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. “मी मागे लागलो तर तुमची अनेक प्रकरणं बाहेर येतील,” असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले, “रक्ताने हात भरलेल्या लोकांना सरकार का सांभाळेल? संतोष भैया देशमुख यांना अजून न्याय मिळालेला नाही. अशा लोकांना मंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही.” या वक्तव्यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी सरकारलाही इशारा दिला. “फडणवीस, शिंदे आणि विखे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून जीआरची अंमलबजावणी होत नाही. सरकार मोठं की अधिकारी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानंतरही नोंदी शोधण्याचे काम का होत नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
“व्हॅलिडिटी प्रमाणपत्रे जाणूनबुजून रोखली जात आहेत. सारथी आणि अण्णासाहेब विकास महामंडळासंदर्भातील मुद्देही आम्ही मांडले आहेत. या अधिवेशनानंतर आम्ही ऐकणार नाही. पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली, तर सरकार अडचणीत येईल,” असा इशाराही जरांगे यांनी दिला.
एकूणच, मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यासोबतचे राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.






