मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव आझाद मैदानावर २९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी भावना मराठा समाजाने बोलून दाखवली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राजकीय क्षेत्रासोबतच आता मनोरंजन विश्वातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. याचदरम्यान, अभिनेता रितेश देशमुख याने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
रितेश देशमुखने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वरुन पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. मनोज जरांगेजी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.”
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो… pic.twitter.com/1lIELovdJC
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 29, 2025
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (दि.30) दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते यांनी मराठा आरक्षणामुळे ओबीसी कोट्याला धक्का लागू नये, असा आग्रह धरला आहे. अशातच आता सरकार मनोज जरांगेंच्या मागण्यांसदर्भात काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







