Pimpri-Chinchwad Election : आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला तरी, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, म्हणजेच शरद पवार (काका) आणि अजित पवार (पुतणे), हे एकत्र येऊन ‘पवार पॅटर्न’ वापरण्याच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Pimpri-Chinchwad Election)

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित बैठक पहिल्यांदाच पार पडली. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना नाना काटे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला की, खासदार सुप्रिया सुळे यांचा त्यांना फोन आला होता आणि त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी एकत्रितपणे लढण्याचा सल्ला दिला होता. यावरून ‘पवार कुटुंबा’तील वरिष्ठ स्तरावरूनच ही आघाडीची चर्चा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसारच ही बैठक घेतल्याचे सांगितले. या बैठकीत भाजपविरोधी लढण्यासाठी ‘घड्याळ’ की ‘तुतारी’ यापैकी कोणते चिन्ह वापरायचे, तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन आघाडीचा विस्तार करायचा की नाही, या प्रमुख मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. (Pimpri-Chinchwad Election)
दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या या राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण राज्यात भाजप आणि शिंदे गट सेना बहुतांश ठिकाणी एकत्र लढणार असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. “आम्ही जर एकत्र लढलो, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल, हे राजकारण आम्हाला दोघांनाही समजते,” असे सांगत त्यांनी दोन्ही पक्ष येथे एकमेकांच्या विरोधात ‘मैत्रीपूर्ण लढत’ लढणार असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, मतदार यादीतील घोळावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी, एसआयआर प्रक्रिया आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानामुळे याद्यांमधील घोळ कमी होईल, असा पर्यायही सुचवला.






