मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेला १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, बोर्डाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यंदाचा राज्याचा निकाल ९१.८८% लागला आहे. दरम्यान, विद्यार्थी दुपारी एक वाजता mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू शकतात. समोर आलेल्या आकडेवारीनुसार ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.४९ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९४.५८% टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर ८९.५१% मुल उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभाग ९६.७४% उत्तीर्णतेसह अव्वल स्थानावर आहे, तर लातूर विभागाने सर्वात कमी म्हणजेच ८९.४६% निकाल नोंदवला आहे.
विविध शाखांमध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी:
विज्ञान – ९७.३५%,
कला – ८०.५२%,
वाणिज्य – ९२.६८%,
व्यावसायिक अभ्यासक्रम – ८३.०३%
आयटीआय – ८२.०३%
विद्यार्थी त्यांचा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून ऑनलाइन पाहू शकतात. विद्यार्थी काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये एक पुरवणी परीक्षा घेतली जाईल. पुरवणी परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२५ मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे.