बापू मुळीक
सासवड : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ततेसाठी पुरंदर तालुका शेतकरी संघटनेकडून सासवड (ता. पुरंदर) येथे लाक्षणिक उपोषण 12 मे रोजी तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर “या भारत -पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाल्यामुळे हे उपोषण स्थगित करून( 19 मे) सोमवारी 10 वाजता नवीन प्रशासकीय इमारत सासवड येथील तहसील कार्यालयासमोर होणार आहे.
याबाबत पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधव यांनी नोंद घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, शेतकरी कर्जमाफी करणे, शेतीची थकीत वीज बिल माफी करणे, शेतीसाठी वीज पुरवठा मोफत देऊन कायम ठेवणे, शेतीमाल निर्यात धोरणात सातत्य ठेवणे, शेतमालास खर्चाच्या प्रमाणात हमीभाव देणे, गुंजवणीचे पाणी दिवळे बंधारा- दिवळे बंधारातून ते नारायणपूर उपसा योजना त्वरित कार्यवाही, अंमलबजावणी करणे, नारायणपूर ते गराडे मार्गे सासवडच्या पश्चिम भागासाठी आणि पुरंदर डोंगर पायथ्या मार्गे, करा नदीचे दक्षिण पट्ट्यातील सासवड ते जेजुरी, पांडेश्वर पर्यंतच्या भागासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याची मंजुरी 0.43 टी.एम.सी मिळालेली आहे, त्यावर त्वरित कार्यवाही करणे. या प्रमुख मागण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याचे, शेतकरी संघटनेचे पुरंदरचे अध्यक्ष दिलीप गिरमे, उपाध्यक्ष उमेश जगताप, विठ्ठल (बंडू) जगताप व संघटनेचे इतर सदस्य यांनी सांगितले आहे.