Leopard : पुणे : पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळील नारायणवाडी परिसरात दोन बिबटे फिरत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने या भागात पिंजरा लावून सापळा रचला होता. या सापळ्यात आज सकाळी एक बिबट्या अडकला असून त्याला सुरक्षितपणे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या बिबट्याने परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली होती. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत पिंजरा लावला आणि सापळा तयार केला. सकाळच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र परिसरात आणखी एक बिबट्या फिरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून वनविभागाकडून त्याचा शोध सुरू आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेषतः ऊसतोडीनंतर ऊसाच्या शेतांमधील त्यांची आश्रयस्थाने कमी झाल्याने बिबटे गावांच्या जवळ येत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात मानवांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले नसले तरी पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.
जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पकडलेल्या बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. उपलब्ध माहितीनुसार या परिसरातून आतापर्यंत 100 पेक्षा अधिक बिबटे पकडण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या केंद्रातून 20 बिबटे गुजरातमधील वनतारा वाइल्डलाईफ रेस्क्यू आणि रिहॅबिलिएशन सेंटर येथे हलवण्यात आले होते. तरीही केंद्रावर बिबट्यांचा ताण कायम आहे.
या पार्श्वभूमीवर माणिकडोह येथे नवीन बिबट निवारा केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे 2 ते 2.5 एकर जागेवर हे केंद्र उभारले जात आहे. मात्र तोपर्यंत पकडलेल्या बिबट्यांची देखभाल आणि अन्नपुरवठा करणे हे वनविभागासाठी मोठे आव्हान ठरत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात मांसाची व्यवस्था करावी लागत असल्याने खर्चही वाढत आहे.
दरम्यान, नागरिकांनी सावध राहावे आणि रात्री एकटे बाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
s






