पुणे: लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने पुणे आणि (Pune Nashik Highway) मुंबईकडून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे पुणे–नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढत असून चाकण ते खेड दरम्यानच्या शिरोली फाट्याजवळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली फाटा परिसरात जवळपास 2 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारच्या कडक उन्हात अनेक प्रवासी आपल्या वाहनांमध्ये अडकून पडल्याने त्यांचे हाल होत आहेत. काही वाहनांना पुढे सरकण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही वाहनचालकांनी सांगितले.
चाकण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नवीन नाही. औद्योगिक वसाहतींमुळे येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने आणि मालवाहतूक सुरू असते. मात्र गेल्या काही महिन्यांत पुणे–नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर परिसरातही अशा प्रकारची वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कोंडी वाढल्यानंतरही बराच वेळ वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. योग्य नियोजन आणि वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता असल्याची मागणीही वाहनचालकांकडून होत आहे.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतूक कधी सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






