पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad News) जनता दरबार आयोजित केला. या जनता दरबारात नागरिकांनी थेट अजित पवारांसमोर आपल्या समस्या मांडल्या. मात्र, या दरबारात आलेल्या 79 वर्षीय आजोबांची तक्रार ऐकून उपस्थितांसह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासक काळातील कारभाराबाबत सुभाष बोधे नावाचे 79 वर्षीय आजोबा अजित पवारांसमोर तक्रार घेऊन आले होते. त्यांच्या घरासमोर पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
बोधे यांनी अजित पवारांना सांगितले की, आधी त्यांच्या घराला समांतर असा रस्ता होता. मात्र, नव्या कामानंतर रस्ता 5 फूट खाली गेला आणि घर वर राहिले. त्यामुळे गाडी घरासमोर पार्क करणे अशक्य झाले आहे. या समस्येवर उपाय शोधण्याऐवजी पालिकेकडून “गाडी बदला” असा अजब सल्ला दिला गेला. हा किस्सा ऐकून उपस्थित नागरिकांनी अक्षरशः डोक्यावर हात मारला.
या तक्रारीनंतर अजित पवार प्रशासनाला काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना भेडसावणाऱ्या अशा अनेक समस्या सोडवण्यासाठीच हा जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अजित पवारांनी हा जनता दरबार केवळ लोकशाही पद्धतीने तक्रारी ऐकण्यासाठी घेतलेला नसून संपूर्ण शासकीय यंत्रणेला सोबत घेऊनच ही प्रक्रिया राबवली आहे. आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी थेट मंचावर उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या नोंदवत होते. त्यामुळे तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे, असा प्रयत्न या दरबारातून होत असल्याचे दिसत आहे.
मात्र, या जनता दरबारामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना जोर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा जनता दरबार म्हणजे अप्रत्यक्ष प्रचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या नात्याने अजित पवार जनता दरबार घेत आहेत, मात्र या कार्यक्रमाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीच उपस्थित होते. भाजपचे आमदार किंवा शहराध्यक्ष कार्यक्रमात गैरहजर होते. यावरून भाजपला मुद्दाम वगळले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संदर्भात भाजपकडून काही प्रतिक्रिया मिळते का, यासाठी नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, भाजप आमदार महेश लांडगे यांनी नेहमीप्रमाणे फोन उचलणे टाळले. आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी “आम्ही प्रतिक्रिया देणार का, हे नंतर कळवतो” असं सांगितलं. तर आमदार अमित गोरे यांनी “मी सध्या पुण्यात आहे, शहरात आल्यावर प्रतिक्रिया देतो” असं उत्तर दिलं. या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या भीतीपोटीच भाजपचे स्थानिक नेते बोलण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु झालेला अजित पवारांचा जनता दरबार हा नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा उपक्रम आहे की महापालिका निवडणुकीपूर्वीचा राजकीय डावपेच, यावरून राजकीय वर्तुळात मतमतांतरे होत आहेत. मात्र, 79 वर्षीय सुभाष बोधे यांनी मांडलेला किस्सा हा या दरबाराचा मुख्य आकर्षण ठरला असून, प्रशासन आणि नागरिकांमधील तफावत किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.







