लोणी काळभोर, ता. 18: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन संदीप धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीनाथ पतसंस्था ( Ajit Pawar Srinath Patsanstha) उभारली आहे. या पतसंस्थेने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबवून मागील 25 वर्षापासून प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांचे काम खरंच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

थेऊर फाटा (ता. हवेली) येथील श्रीनाथ सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाचे गुरुवारी (ता. 18) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना वरील प्रतिपादन अजित पवार यांनी केले आहे. यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे, शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी आंबेकर, संचालिका सुनिता धुमाळ, वैशाली मेमाणे, सचिन तुपे, ज्ञानेश्वर धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाढवे, महादेव धुमाळ, राहुल धुमाळ, अजय कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, पोपट चौधरी, विश्वनाथ रुपनर, उमेश राखपसरे, राजेंद्र गायकवाड, व्यवस्थापक शिवाजी जावळे, गजानन सानप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, या संस्थेने सहकाराच्या तत्वावर ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांना सक्षम करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. या संस्थेने शेतकरी व छोट्या व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले आहे. हवेली तालुक्याच्या विकासासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. सहकार, विश्वास व पारदर्शकतेच्या बळावर ही पतसंस्था उभी राहिली आहे. आणि आज यासंस्थेच्या रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
दुष्काळ, कोरोनाच्या महामारीत आर्थिक मंदी होती. चढउतार असतानादेखील पतसंस्थेने चांगले काम केले आहे. आता संस्थेचे 2 हजारापेक्षा जास्त सभासद आहेत. तर पतसंस्थेत 42 कोटींच्या ठेवी असून संस्थेकडे 63 कोटी रुपयांचे खेळतं भांडवल आहे. संदीप धुमाळ, सचिन तुपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पतसंस्था चालविताना विश्वासाहर्ता व पारदर्शकता राखली आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. असे अजित पवार म्हणाले.
यशवंत कारखान्याच्या जमीन विक्री व्यवहारात एक रुपयाची सुद्धा गडबड होणार नाही
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बरेच वर्ष बंद पडलेला होता. कारखाना सुरु करण्यासाठी सुभाष जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला. आणि कारखाना सुरु करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची 100 एकर जमिन विक्री केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कारखान्याची जमीन हवेली कृषी उत्पन समिताला 299 कोटी रुपयांच्या विक्रीला कॅबिनेट मंत्री मंडळाने परवानाही दिली आहे. या जमिनीचा व्यवहार हा पारदर्शक असून चेकद्वारे होणार आहे. त्यामुळे यशवंत जमीन विक्री व्यवहारात एक रुपयाची सुद्धा गडबड होणार नाही. असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.
पुरंदर विमानतळ ते लोणावळ्यापर्यंत मेट्रो नेणार
एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर काही जण नाराज होतात. परंतु, आम्हाला काही जणांना दुखवून जनतेच्या विकासासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पुरंदर येथे भारतातील दोन नंबरचे सर्वात मोठे विमानतळ बांधण्यात येणार आहे. आणि हे विमानतळ 3 वर्षाच्या आत बांधून नागरिकांना सुविधा देण्यासाठी पुरंदर विमानतळ ते लोणावळ्यापर्यंत मेट्रो नेण्याचा आमचा मानस आहे. असे यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.







