मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगाने (Rajya Sabha Election) हालचाली घडत आहेत. निमित्त आहे आगामी राज्यसभा निवडणुकीचं. महाविकास आघाडीच्या (मविआ) वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सर्वेसर्वा शरद पवार स्वतः मैदानात उतरणार की नाही, यावरून सस्पेन्स वाढला आहे. गुरुवारी मध्यरात्री पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीने या चर्चेला उधाण आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्त बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांसारखे पवारांचे अत्यंत विश्वासू शिलेदार उपस्थित होते. पक्षाची ताकद टिकवण्यासाठी आणि दिल्लीत मविआचा आवाज बुलंद करण्यासाठी पवारांची उमेदवारी गरजेची असल्याचं मत नेत्यांनी मांडलं.
स्वतःच्या उमेदवारीवर भाष्य करण्याऐवजी शरद पवारांनी सांगितले कि, “या जागेबाबत आधी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा करा, त्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ,” असा सल्ला त्यांनी दिला.
मविआकडे सध्या केवळ एक जागा आरामात निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. मात्र, ठाकरे गटानेही या जागेवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. अशा वेळी मित्रपक्षांमध्ये वाद होऊ शकतो, दरम्यान, शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






