इस्लामाबाद: दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून धुमसत असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाचे रूपांतर आता थेट युद्धात झाले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध अधिकृतपणे ‘ओपन वॉर’ची (Afghanistan vs Pakistan war) घोषणा केली असून, दोन्ही देशांच्या सीमांवर तोफा धडाडू लागल्या आहेत.

या युद्धाची सुरुवात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाई हल्ल्यांनी (Air Strikes) झाली. काबूलमध्ये झालेल्या स्फोटांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामधील तालिबानी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांनी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला, मात्र अफगाणिस्तानने यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानच्या एअरस्ट्राइकनंतर तालिबानने चोख प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी रात्री उशिरा अफगाण सैन्याने सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला. तालिबानचा दावा आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या 19 लष्करी चौक्यांवर कब्जा मिळवला असून 55 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले कि, “आमचा संयम आता संपला आहे, आता दमादम मस्त कलंदर होईल,” असा इशारा देत युद्धाची घोषणा केली. अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही “कोणालाही सोडले जाणार नाही” असे म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.






