कल्याण : कल्याण शहरातील उंबर्डे परिसरात (Shocking News) कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून आरोपी पती थेट नाशिकला जाऊन पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाल्याने या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (वय 30) याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. (Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना आणि विशाल यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक मतभेद होते. त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिक येथे राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील एका चाळीत राहून घरकाम करत आपल्या पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत होती. 11 मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणला आला होता. त्याने पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्याची विनंती पत्नीसमोर मांडली. मात्र अर्चनाने त्याला नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.
या वादातून संतापलेल्या विशालने अर्चनावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी विशाल नाशिकला पळून गेला. तेथे एका पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या पत्नीची हत्या करून आलो आहे,” अशी कबुली त्याने दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता अर्चनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. नंतर नातेवाईकांनी तिची ओळख पटवली.
या प्रकरणी अर्चनाच्या मामेभावाने दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन आरोपी विशाल भुतकर याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दाम्पत्याच्या नऊ वर्षांच्या मुलासमोर घडली असून तो या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक वादाचे टोक गाठल्यास त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे.







