मुंबई: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची (Mumbai) झळ आता भारताला लागत आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा मोठा फटका मुंबईतील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. गॅसअभावी मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्सना आधीच टाळे लागले आहे.

युद्धामुळे इराण आणि आसपासच्या प्रदेशातून होणारी गॅसची वाहतूक ठप्प झाली आहे. जहाजांचे मार्ग बदल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे एलपीजी (LPG) आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत आला आहे. यामुळे केवळ मुंबईच नाही, तर बंगळुरूमध्येही अनेक प्रसिद्ध हॉटेल्सनी आजपासून कामकाज बंद ठेवले आहे.
जर येत्या 72 तासांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील 50 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हॉटेल चालकांकडे असलेला राखीव साठा आता संपत आला आहे. येणाऱ्या काळात घरगुती गॅसची टंचाईही भासू शकते.







