loni kalbhor : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या हद्दीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गणेश नगर परिसरातील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर एक्सपायर औषधे उघड्यावर फेकण्यात आली आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर दुर्गंधीने त्रस्त झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर थेट धोका निर्माण झाला आहे.

औषधांचा कचरा हा अत्यंत धोकादायक आणि संवेदनशील मानला जातो. अशा कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावणे बंधनकारक असताना, संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या दुर्गंधीमुळे शेजारील रहिवासी आणि रस्त्याने जाणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही प्रशासन मात्र ‘बघ्याची’ भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे तुळसे यांच्याकडे भाजप नेते धनंजय आप्पा कामठे, विराज कड आणि श्याम जायभाई यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून त्वरित परिसर स्वच्छ करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी? आणि प्रशासन जागे होणार तरी कधी? असा नागरिकांनी एकच सवाल प्रशासनाला विचारला आहे.







