Crime : ज्या घरात अवघ्या 5 दिवसांनंतर सनई-चौघडे वाजणार होते, लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण होते, तिथे आज काळीज पिळवटून टाकणारा टाहो फोडला जात आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या 28 वर्षीय शिक्षिका प्रीती संजू सिंग यांनी प्रबळगडाच्या खोल दरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या भावाला धाडलेला शेवटचा ‘Goodbye’ हा मेसेज आता त्यांच्या कुटुंबासाठी जन्मभराची जखम ठरला आहे.

नेमकं काय घडलं?
मूळच्या बिहारच्या असलेल्या प्रीती सिंग सध्या कोपरखैरणे Sector 12 येथे वास्तव्यास होत्या. येत्या 3 मार्च रोजी त्यांचा विवाह होणार होता. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच, घरगुती वादातून रागाच्या भरात त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी त्या पनवेलमधील माची प्रबळगड येथे पोहोचल्या आणि गडाच्या कड्यावरून थेट दरीत झेप घेतली.
धोकादायक शोधमोहीम
प्रबळगड हा भाग अत्यंत दुर्गम आणि निसरडा मानला जातो. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. माहिती देणाऱ्याचा संपर्क तुटल्याने सुरुवातीला अंधारात चाचपडणाऱ्या पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून खोल दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. घनदाट जंगल आणि कड्याच्या धोकादायक भागात शोध घेतल्यावर प्रीती यांचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी आणि माचीवरील तरुणांनी दाखवलेल्या धैर्यामुळेच हा मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले.







