पुणे : राज्यात पहाटे गारठा कायम असून शुष्क व कोरडे हवामान आहे. थंडीचा जोर कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा आता 15-23 अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसात हवामानात मोठे बदल होणार आहेत. तसेच वाढलेल्या किमान तापमानाच्या पाऱ्यात आता 1-2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तामपानात वाढ होणार आहे.
येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे वातावरण असणार आहे. पावसाची कोणतीही शक्यता नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात काहीशी घट होणार असून राज्यात गारठा वाढू लागेल. तर कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्याने उकाड्याचा जोर वाढेल.
आसाम आणि परिसरात सध्या चक्राकार वाऱ्यांचे झोत सक्रीय आहेत. त्यामुळे पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्याचे झोत असल्याने थंडीमध्ये चढउतार बघायला मिळत आहे. मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालं असून येत्या तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा गारठ्याचा सामना करावा लागणार आहे असा अंदाज भारतीय हवामान केंद्राने वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात कोरडे व शुष्क वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत.
शुक्रवारी (25 जानेवारी) मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात किमान तापमानात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा 11-21 अंशांपर्यंत होता. मुंबईत कुलाब्यात 21.2 अंश सेल्सियसची नोंद झाली. तसेच सांताक्रूझ भागात 19.3 अंश सेल्सियस तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात 17.8 अंश तर लातूरमध्ये 19.9 अंश तापमानाही नोंद करण्यात आली. पुण्यात 14-16 अंश तापमान होतं.