पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण भारतातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात 37 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदी करण्यात येत आहेत. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण आहेत. पुढील पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. आज (26 फेब्रुवारी) मुंबईसह सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर पाकिस्तानला जोडून हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमी चक्रवात तयार झाला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, लडाख हिमाचल प्रदेशसह पंजाब,हरियाणा, राजस्थानपर्यंत तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे दक्षिणेत अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्राकार वारे वाहत असल्याने तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ईशान्य भारतातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवण्यात येत आहे.
‘या’ 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात उष्ण आणि दमट हवामान दिसून येत आहे. दोन दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान होते. मुंबईत पारा 38 अंश सेल्सिअस वर जाऊन पोहचला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा झळांना सामोरं जावं लागत आहे. प्रादेशिक हवामानात केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून आज (26 फेब्रुवारी) पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. .
मंगळवारी तापमान कसे होते?
मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 35 अंशावर जाऊन स्थिर झाले होते. साताऱ्यात 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. सोलापुरातही पारा 38 अंश सेल्सिअस वर होता. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर 36.4 अंश सेल्सिअस, हिंगोली 36, बीड 35, लातूर 37.6, धाराशिव 34.2 डिग्री सेल्सिअसवर होते. विदर्भात नागपूर 33.2, नंदुरबार 42, धुळे 36.4, वर्धा 35.7 अंश सेल्सिअसवर होते.