सोलापूर: गावातील क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळताना कॅच घेता घेता तो सरळ विहिरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला. पोटचा गोळा विहिरीत पडल्याचे मित्रांनी जेव्हा मृत ओंकारच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांना सांगितले. तेव्हा आईला हंबरडा फुटला, ती जमिनीवर कोसळली. वडिलांची बोबडी वळली. त्यांना काहीच सुचेना ते खाली बसले. दहावीची परीक्षा देऊन आलेला ओंकार सुट्टी लागल्याच्या आनंदात मनसोक्त क्रिकेट खेळत होता, याच टप्यावर नियतीला त्याचे हे मनसोक्त खेळणे आणि आयुष्य जगणे जणू मान्य नसावे. क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेऊन मित्राला आऊट करून आनंद मिळविण्याच्या नादात असलेल्या ओंकावर जणू काळाने झडप घातली. मित्राचा कॅच त्याची विकेट घेता घेता, तो स्वतःच्याच आयुष्याची कायमची विकेट घालवून बसला.
ओंकार याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्याच्या सोबत क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांमध्ये सन्नाटा पसला. मंगळवारी (ता.२५) त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होताना त्याच्या सर्व मित्रांच्या डोळयाच्या कडा पाणवल्या. कंदलगावसह पंचक्रोशीत त्याच्या कायमच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या क्रिकेटच्या मैदानावर तो क्रिकेट खेळायचा, ते मैदान मंगळवारपासून अक्षरशः सुने सुने झाले. ओंकारच्या कायमच्या सोडून जाण्याने त्याचे कुंटुंबिय आणि मित्र परिवार शोकसागरात बुडाला आहे.
ओंकार संजय चव्हाण (वय १६) हा विजापूर रस्त्यावरील एका आश्रम शाळेत शिकत होता. दहावीची परीक्षा संपल्याने तो गावी कंदलगावला आपल्या घरी आला होता. आई-वडिलांना शेतीपयोगी साधने बनवण्याच्या कामात मदत करुन उरलेल्या वेळेत मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा प्लॅन त्याने सुट्टीचा केला होता. त्यानुसार, सोमवार (ता. २४) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ओंकार मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. विहिरीच्या कडेला मित्राचा कॅच घेताना तो पाय घसरून खोल असलेल्या विहिरीत पडला.
ओंकार विहिरीत पडल्याचे कळताच त्याच्या मित्रांनी गलका केला. आई-वडिलांसह केंदलगावच्या ग्रामस्थांना मित्रांनी तो विहिरीत पडल्याची माहिती दिली. मात्र, रात्र झाल्याने ओंकारला विहिरीतून काढण्यात अडचणी आल्या. या घटनेचा तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने, हे करीत आहेत.
ओंकारच्या आयुष्याची दोरीच तुटली होती…
क्रिकेट खेळताना मुलगा विहिरीत पडल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. सोमवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. विहिरीत पडलेला ओंकार सापडत नसल्याने आणि विहीर खोल असल्याने तत्काळ मंद्रूप पोलीस ठाणे येथे’ या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलीस आणि गावकऱ्यांनी तत्काळ मनगोळी येथील भूई कमलाकर डिरे, अनिल सले, अजय नगरे, हर्षद कांबळे, फारुख नदाफ यांच्या मदतीने रात्री उशिरा मृत ओंकारचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले. मात्र, शोध कार्य करण्यास उशीर लागला, तोपर्यंत ओंकारचा मृत्यू झाला होता. त्याच्या आयुष्याचीच दोरी तुटली होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि मंद्रूप पोलिसांचे त्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल ठरले.
आई-वडिलांसह दोघा भावांचे अश्रू थांबता थांबेनात
परिवारातील हुशार ओंकार कायमचा सोडून गेल्याने त्याच्या कुटुंबातील आई-वडिल तसेच दोघे भाऊ शोकसागरात बुडाले आहेत. ओंकारचे दुःख पचविणे खूप अवघड चालले आहे. त्यांच्या डोळ्यातील आश्रू थांबता थांबेनात.
अंत्यसंस्कारावेळी सर्वांनाच आला हुंदका
मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन करून ओंकारचा मृतदेह मंगळवारी कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी ओंकारचा मृतदेह सरणावर ठेवला गेला, तेव्हा उपस्थित सर्वांनाच हुंदका आला. ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ओंकारच्या आयुष्याचा सगळाच खेळ खल्लास झाला होता. दहावीत शिक्षण घेणाऱ्या ओंकारचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओंकारच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.