बुलढाणा : जिल्ह्यातील राज्य पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करून जीवन संपवलं. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसाठी हक्काचं पाणी मिळावं अशी मागणी करत त्यांनी आत्महत्या केली. कैलास नागरे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला मंत्र्यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. त्यावेळी, कैलास यांच्या बहिणीने ‘लाज वाटली पाहिजे यांना, पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? लाज नाही वाटत यांना. माझ्या भावाच्या नावासमोर आत्महत्या नाही तर बलिदान हा शब्द लावण्यात यावा, अशा शब्दात पीडित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या बहिणीने मंत्र्यांनाच सुनावले आहे.
अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज(16 मार्च) त्यांच्या मूळ गावी शिवनी आरमाळ येथे संपन्न झाला.
राजकारण्यांना खडे बोल सुनावले
दरम्यान आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी कैलास नागरे यांची बहीण सत्यभामा नागरे यांनी ‘लाज वाटली पाहिजे यांना, पालकत्व येत नसेल तर पालकत्व का स्वीकारता? देशाला कृषिप्रधान म्हणता? अशा शब्दात त्यांनी राजकारण्यांचा खडे बोल सुनावले. मंत्री प्रतापराव जाधव आणि आ.सुनील कायंदे यावेळी उपस्थित होते. “माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका, तर बलिदान हा शब्द वापरावा’. असं भावनिक आवाहनही सत्यभामा नागरे यांनी यावेळी केलं.