देऊळगाव राजा: शिवणी आरमाळसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी लढा उभारणारे, राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला वैतागून १३ मार्चला आत्महत्या केली. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना उद्देशून चार पानांचे भावनिक पत्र लिहिल्यानंतर शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.
पाण्यासाठी ही आपली आहुती असून, यापुढे एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, यासाठी पाण्याची हमी द्या, अशी आर्त विनवणी ‘सुसाइड नोट’मध्ये करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळचे रहिवासी असलेले कैलास अर्जुनराव नागरे यांनी सिंचनाच्या पाण्यासाठी शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता.
गावातील धरणाच्या पात्रात काही दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदारांच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आले आहे. शेती आहुती मागतेय, कृपया पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पाण्याची हमी द्या, असा उल्लेख चिठ्ठी करण्यात आला आहे. ऐन होळीच्या सणालाच शेतकऱ्याने सरकारचे डोळे उघडण्यासाठी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने शासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.