यवत : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विविध मागण्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
यावेळी जिल्हाअंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये ५३ वर्ष पूर्ण होण्याची तारीख ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी व या बदली प्रक्रियेपूर्वी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक या सर्व पदांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी . दुर्धर व गंभीर आजार असणाऱ्या पाल्यांच्या शिक्षक पालकांना जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एकचा लाभ देण्यात यावा.सन २०१८ व सन २०२२ च्या अवघड क्षेत्राच्या यादीमध्ये समाविष्ट असलेले पण १८ जून २०२४ च्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या शाळेतील शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात यावे .अंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवा जेष्ठता पूर्वीच्या जिल्ह्याची धरावी.
पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या रखडलेली पद्दोन्नती प्रक्रिया पूर्ण करून, रिक्त असलेल्या मुख्याध्यापकांच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या असून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार, आमदार सत्यजीत तांबे, आमदार सुरेश धस, संजय केळकर, निरंजन डावखरे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.