नाशिक : म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यातील कौटुंबिक कलहातून चिमुकलीच्या मृतदेहाचे हाल झाले. पत्नी माहेरी निघून गेल्याने वडिलांसोबत राहणारी दीड वर्षीय बालिका खेळता खेळता विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची वाच्यता न करता वडिलांनी म्हसरूळच्या स्मशानभूमीत मुलीचा दफनविधी केला. दोन दिवसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पतीनेच घातपात केल्याचा संशय आईने व्यक्त केला. पोलिसांनी मुलीचा दफन केलेला मृतदेह उकरून काढला. शवविच्छेदनाअंती या पाण्यात बुडून झाल्याचे मुलीचा मृत्यू स्पष्ट झाले.
वैष्णवी विकास वळवी असे मृत बालिकेचे नाव आहे. विद्या व विकास यांचा विवाह २०२१ मध्ये झाला. त्यांच्यातील कौटुंबिक वाद गंगापूर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर हे दोघे विभक्त राहू लागले. दीड वर्षीय वैष्णवीचा सांभाळ विकास करीत होता. दोन दिवसांपूर्वी घराजवळ खेळत असताना वैष्णवीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विकासने तिला विहिरीतून बाहेर काढले. याबाबत कोणास काहीही न कळवता त्याने वैष्णवीचा दफनविधी उरकवून टाकला.
या प्रकाराची माहिती वैष्णवीची आई विद्या यांना कळाली. त्यांनी थेट डायल ११२ ला फोन करून यासंदर्भात माहिती देत विकासवर संशय व्यक्त केला. पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, म्हसरूळचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक व नातलग स्मशानभूमीत पोहोचले. वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. तिचे शवविच्छेदन केले असता, तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत म्हसरूळ पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सखोल तपास केला जाणार आहे.