बीड: जिल्ह्यातील मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सरपंच खून प्रकरणी अखेर सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच अॅड.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आता,निकम यांनी या नियुक्तीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच हत्या प्रकरणाच्या संदर्भातील खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांसाहित स्थानिक आमदार सुरेश धस यांनीही केली होती. अखेर, देशमुख कुटुंबीय गावकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलनास बसल्यानंतर या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम म्हणाले..
‘मी न्यायासाठी लढणारा व्यक्ती आहे, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातल्या जनतेला माहीत आहे. पोपटगिरी करणाऱ्या लोकांना पोपटगिरी करू द्या, त्यांना मी भीक घालत नाही. देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. राजकीय लोकांच्या चिथावणीकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबीयांना केले आहे’.
तसेच प्रतिक्रिया देताना म्हणाले, “सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणात माझा सहभाग सुरू होईल. बऱ्याच दिवसापासून गावकरी आणि देशमुख कुटुंब हे सतत माझ्या नावाची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करत होते. ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर रात्री मी मुख्यमंत्र्यांना कळवलं की, या प्रकरणात मी सरकारी वकील म्हणून काम करायला तयार आहे. याप्रकरणी, माझ्यावर करण्यात येणाऱ्या राजकीय टिकेची मला गंमत वाटते, एक निवडणुक मी लढलो. मात्र राजकीय परिपक्वता नसलेले लोक माझ्यावर टीका करत आहेत. गावकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही काळजी करू नका, मी आहे. असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे”.