बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरला बसला होता. या प्रकरणाचे पडसाद दिल्लीत सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देखील उमटले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेने मराठवाड्यातील विविध मुद्द्यांवरून मांडलेल्या ठरावावरून साहित्य संमेलनाच्या बैठकीत खडाजंगी झाली असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय घडलं..
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, तसेच मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप व खंडणीखोरी हे मराठवाड्याला लागलेले ग्रहण आहे. मराठवाड्याचे हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचा विचार न करता मराठवाड्यातील गुंडगिरी संपवण्याची हमी द्यावी, अशी मागणी करणारा ठराव मराठवाडा साहित्य परिषदेकडून मांडण्यात आला आहे.
संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा करण्यात येते. या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेने मराठवाड्यातील विविध मुद्यांबाबत ठराव मांडला. यामध्ये बीड आणि परभणीतील हत्या आणि मृत्यू प्रकरणाचा देखील समावेश आहे.
सामाजिक-राजकीय विषयांवर चर्चा नको..
मात्र, आपण केवळ साहित्यिक विषयांवर चर्चा करूया. सामाजिक-राजकीय विषयांवर नको, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावर संमेलनात राजकीय-सामाजिक विषयांवरील परिसंवाद घेतले जातात. मग ठराव का नकोत? असा प्रश्न मराठवाडा साहित्य परिषदेने उपस्थित केला. त्यामुळे आता महामंडळ हा ठराव स्वीकारणार का? हे संमेलनाच्या समारोपावेळी कळणार आहे.
सामाजिक विषयांयाबाबत संवेदनशील भूमिका हवी..
दरम्यान सामाजिक विषयांवर संवेदनशीलतेने भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. काळुंखे म्हणाले, ‘एकीकडे आपण दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या साहित्यिकांची परंपरा अभिमानाने मिरवतो आणि दुसरीकडे राजकीय-सामाजिक विषयांवर भूमिका घेत नाही. हे योग्य नाही.’