बीड: बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीला विष देऊन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोमल नागेश पाटोळे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली. घरगुती वादातून पतीने बळजबरीने विष पाजल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पाटोळे दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दरम्यान पती आणि पत्नीमधील वाद इतका टोकाला पोहोचला की, संतप्त झालेल्या पतीने थेट आपल्या पत्नीला विषारी औषध पाजले. या कृत्यामध्ये केवळ पती सहभागी नव्हता, तर त्यामध्ये सासरच्या मंडळींचा सहभाग होता, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. विष पाजल्याने पीडित सदर महिलेची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान आता या संदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी बीड जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.