सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): चार दिवसांवर मुलीचे लग्न ठरले असताना स्वतःच्या राहत्या घरात वांगी येथील एका ५५ वर्षीय शेतकरी पित्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना रविवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. मरण पावलेल्या शेतकरी वधू पित्याचे नाव सर्जेराव भागाजी साळवे ( वय ५५ रा. वांगी ता. सिल्लोड ज़ि. छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
शेतकरी सर्जेराव साळवे यांच्या मुलीचे लग्न १८ एप्रिल रोजी ठरले होते. घरात सर्वत्र लग्नाची तयारी सुरू असताना अचानक वधू पित्याने गळफास घेतला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी पत्नी व मुलं झोपेतून उठल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती सिल्लोड पोलिसांना देऊन साळवे यांना सकाळी ८ वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर वांगी येथे रविवारी दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.