कळंबः तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी भारत चोंदे यांनी कमी दाबाने वीजपुरवठा तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने सिताफळ बाग जोपासणे अवघड होत असल्याने सिताफळ बागेवर जेसीबी फिरवला. तांदुळवाडी शिवारातील स्वतःच्या शेतात शेतकरी चोंदे यांनी सिताफळ बागेची लागवड सन २०१९ मध्ये केली होती. गत दोन ते तीन वर्षांपासून कधी कमी विद्युत पुरवठा, तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने शेतात वीजपुरवठा ठप्प होत होता. संबंधीत डिपीवरुन अनधिकृत जोडण्यामुळे डिपीवर खूप लोड येत होता. कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होते. यामुळे चोंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
गेल्यावर्षी नियोजन समितीच्या बैठकीत प्रताप डिकले यांच्या शेतामध्ये नविन डिपी उभारण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने आणि वारंवार ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली सिताफळ बाग चोंदे यांनी शेतात जेसीबी फिरवून नष्ट केली. चोंदे यांनी व्याजाने पैसे घेऊन व बँकेकडून कर्ज काढून सिताफळ लागवड केली होती. लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केला, पण मजुरीचाच काय लागवडीचाही खर्च निघाला नाही. मोठे नुकसान झाल्यामुळे ‘चोंदे यांनी सिताफळ बागेवर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली.
वीजेच्य समस्येमुळे नुकसान
दोन एकर शेतात सिताफळ लागवड केली होती. या बागेवर कमीत कमी दोन लाखांपेक्षा जास्त खर्च केला. मात्र वीज समस्येमुळे हातात एक रुपयासुध्दा आला नाही. सरकारने शेतीसाठी पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा.
– भारत चोंदे (शेतकरी)