बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात मोठे गौप्यस्फोट समोर आले आहेत. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आता सरपंच हत्येचा सुत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं स्पष्ट झालं आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येची साखळी एकच असल्याचा मोठा उलगडा सीआयडीने केला आहे.
सरपंच हत्या प्रकरणी मोठे खुलासे समोर आले आहेत. सीआयडीच्या आरोपपत्रापूर्वी तिन्ही घटनांचा वेगवेगळा तपास केला जात होता. मात्र आता खंडणी ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्र करून त्याचा तपास केला जात आहे. सीआयडीच्या तपासात या तिन्ही घटना एकमेकांना पूरक असल्याचं समोर आलं आहे.
कायद्यानुसार आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर ९० दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची मुभा तपास यंत्रणेला असते . मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी ने केवळ ८० दिवसात चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात खंडणीचा गुन्हा हा ॲट्रॉसिटीशी सुसंगत आहे. तर ॲट्रॉसिटीचा मारहाणीशी आणि मारहाणीचा हत्येशी. आता या गुन्ह्यांच्या साखळीचा उलगडा सीआयडीच्या आरोपपत्रात केला आहे.
दाखल झालेल्या आरोपपत्रामधून वाल्मीक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे.