रत्नागिरी: पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सुमारे महिनाभरापूर्वी समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या सात भारतीय खलाशांची अखेर सुखरूप सुटका झाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश असून, त्यांच्या सुटकेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
‘एमव्ही बिटू रिव्हर’ नावाचे डांबर वाहतूक करणारे जहाज कॅमेरूनमधील डुआला बंदराकडे निघाले होते. पश्चिम आफ्रिकेच्या सागरी हद्दीत पोहोचल्यावर चाच्यांनी जहाजावर हल्ला चढवून ते ताब्यात घेतले. जहाजावरील सात भारतीय खलाशांचे चाच्यांनी अपहरण केले. यामध्ये रत्नागिरीच्या भाटकरवाडा येथील समीन जावेद मिरकर आणि कर्ला येथील रेहान शब्बीर सोलकर या दोन तरुणांचा समावेश होता.
या अपहरणाच्या घटनेची केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागाने गंभीर दखल घेतली होती. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांच्याशी त्या दोघांच्या सुटकेबाबत निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर कॅप्टन फैरोज मुकादम, मुनीर कर्लेकर, मोहम्मद सहर कर्लेकर यांनीही त्यांच्या पालकांना मदत केली. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी सर्व सात भारतीय खलाशांची समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. सुटकेनंतर समीन मिरकर आणि रेहान सोलकर यांच्या कुटुंबीयांनी आणि रत्नागिरीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. सुटका झालेले समीन आणि रेहान हे दोन्ही तरुण शनिवार, १२ एप्रिल रोजी आफ्रिकेतून भारताकडे परतण्यासाठी निघाले आहे