नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळबाजारात सध्या हापूस आंब्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी हापूसच्या साडेतीन हजार पेट्या दाखल झाल्या, आवक वाढत असल्याने दरदेखील घसरले असतानाही दर्जानुसार दरात पेटीमागे ३०० ते १००० रुपयांची घसरण पाहावयास मिळत आहे. बाजारात सध्या ३००० ते ६००० रुपये मेटीला दर मिळत आहे. मात्र होळी सरताच बाजारात आवक वाढणार असून दरदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
यंदा बाजारात देवगड हापूसच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली. यंदा उत्पादन चांगले असेल असा अंदाज आहे. परंतु, मध्यंतरीच्या पावसाने, हवामान बदल यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात एक महिना उशिराने हंगामाला सुरुवात होत आहे. एपीएमसी बाजारात डिसेंबरपासून तुरळक प्रमाणात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. यंदा हापूसचे उत्पादन जास्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र यंदा हापूसला मोहोर फुटण्याच्या वेळी कडाक्याची थंडी आणि पाऊस पडल्याने मोहोर गळून पडला होता. परिणामी शेतकऱ्यांचा औषध फवारणी खर्च दुपटीने वाढला आहे. साधारणतः मार्च महिन्यात हापूसचा खरा हंगाम सुरू होतो, मात्र सुरुवातीच्या पावसामुळे यावेळी हंगामाला उशिरा सुरुवात होणार, असे बोलले जात होते. पंधरा दिवसांपूर्वी बाजारात एक दिवस आड हापूसच्या पेट्या दाखल होत होत्या. मात्र आता आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या बाजारात देवगड, रायगड आणि कर्नाटक येथून अडीच हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेट्या कोकणातील हापूसच्या आहेत. सोमवारी बाजारात ४-६ डझनच्या ३५०० पेट्या दाखल झाल्या असून पेटीला ३००० ते ६००० बाजारभाव आहे. मागील आठवड्यात ४-६ डझनाला ४००० ते ९००० रुपये दर होता. त्यामुळे दरातही घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आता होळीचा सण सरताच हापूस आंब्यांची आवक आणखी वाढणार असून त्याचे दर देखील आवाक्यात येतील, अशी माहिती येथील फळ व्यापाऱ्यांनी दिली.