पुणे : छावा चित्रपट सध्या देशभरात बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या चित्रपटातील काही ऐतिहासिक घटनांबाबत अनेक मतमतांतर असल्याचा पाहायला मिळत आहे. याबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी देखील आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर ब्राह्मण द्वेष पसरत असल्याचा आरोप करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचे आता संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत.
या प्रकारानंतर इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत. इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये समोरील व्यक्तीकडून सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कॉल करणारा व्यक्ती आपण नागपूर येथील असून आपलं नाव प्रशांत कोरटकर असल्याचं सांगत आहे.
तर दुसरीकडे प्रशांत कोरटकर यांनी माध्यमांसमोर येत हे सर्व आरोप फेटाळून लावले असून ऑडिओ रेकॉर्डिंग मधला आवाज आपला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच आपली बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून कोणीतरी खोडसाळपणे हे सर्व कृत्य केल्याचा दावा देखील कोरटकरकडून करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
या सर्व प्रकरणानंतर आता कोरटकर यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत. रोहित पवार म्हणाले, “जीवे मारण्याची धमकी इंद्रजीत सावंता यांना देण्यात आली असेल तर पोलीस सुरक्षा धमकी देणाऱ्याला कशी काय देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजे यांच्याबद्दल बदनामीकारक शब्द वापरणाऱ्या नतद्रष्टावर कारवाई करण्याऐवजी त्याला सुरक्षेचं कवच?” असा आरोप रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
पोलीस यंत्रणा फक्त राजकीय आदेशावरच चालणार का
रोहित पवार म्हणाले,”पुण्यात एका अत्यंत मोठ्या गुंडाला मंत्र्याच्या एका फोनवर मकोका लावून अर्ध्या तासात पकडले जाते, परंतु मस्साजोग प्रकरणात अडीच महिने उलटूनही आरोपी सापडत नाही, परभणी प्रकरणाचा तपास पुढे सरकत नाही, याचा अर्थ काय घ्यावा? पोलीस यंत्रणा फक्त राजकीय आदेशावरच चालणार का? की राजकीय हस्तक्षेप कारवाईच्या आड येतो? असा सवाल रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.