पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच रांजणगाव गणपती आणि परिसरातील गावांना पाणी पुरवठ्याचा स्रोत असलेल्या कोंढापुरी तलावातील पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी पाणी पुरवठा योजनेचे जॅकवेल उघडे पडले आहेत. या तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या रांजणगाव गणपती, कोंढापुरी, खंडाळे, गणेगाव सह इतर गावांच्या नळपाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर असून पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी चासकमानच्या डाव्या कालव्यातून चासकमान धरणाचे पाणी कोंढापुरी व कुंभारखाणी तलावात सोडून कमीतकमी दोन ते अडीच महिने पुरेल अशा क्षमतेने तलाव पाण्याने भरावा अशी मागणी रांजणगाव गणपतीच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा वायदंडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, कोंढापुरीच्या सरपंच अपेक्षा गायकवाड, उपसरपंच सुनील गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने शाखा अभियंता चासकमान प्रकल्प शिक्रापूर यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अष्टविनायकांपैकी एक असलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपतीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात, याशिवाय रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील विविध कंपनी कामगारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात रांजणगाव, कोंढापुरीमध्ये आहे, त्यामुळे रांजणगाव गणपतीची सध्याची स्थायी व अस्थायी लोकसंख्या मिळून सुमारे 50 हजाराच्या आसपास आहे. कोंढापुरी तलावावरून रांजणगाव ग्रामपंचायतीने सुमारे वीस कोटी रुपये खर्च करून नळपाणी पुरवठा योजना राबविली आहे. परंतु सध्या तलावातील पाण्याने तळ गाठल्याने एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या गावच्या नागरिकांना पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही. परिणामी पाण्याअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
रांजणगाव गणपतीचे ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर देशमुख यांनी प्रत्यक्ष जाऊन नुकतीच कोंढापुरी तलावाची पाहणी केली असून कोंढापुरी तलावातील पाणी संपुष्टात आला आहे. दरम्यान कोंढापुरी ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना गावातीलच कुंभारखाणी तलावातून करण्यात आलेली आहे. मात्र, हा तलावही कोरडा ठाक पडल्याने नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे कोंढापुरीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाराम रासकर यांनी सांगितले.
मागच्या आवर्तनात कोंढापुरी तलावात पाणी सोडले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे पाण्याअभावी मोठे नुकसान होऊन नागरिकांना तीव्र पाणी टंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तरी चासकमानचे पाणी कोंढापुरी व कुंभारखाणी तलावात सोडून रांजणगाव गणपती व परिसरातील गावच्या नागरिकांची पाण्याअभावी होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील व कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांनी केली आहे.