दौंड (पुणे) : दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या बॅरेकमधून चार पोलिसांचे मोबाईल फोन आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक-5 मधील बॅरेक येथे 3 मार्च रोजी रात्री 10 ते 4 मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
अज्ञात चोरट्यांनी पोलिस अंमलदार रिझवान फारुख शेख, जालिंदर बाबूराव भाबड, योगेश सुरेश किकले व अक्षय मनोज चव्हाण यांचे मोबाईल फोन चोरले. तर शेख यांची बॅग चोरली. या बॅगेत चार हजार रुपयांची रोकड, एटीएम कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड होते. तसेच अंमलदार सावकार मच्छिंद्र वाघ यांची देखील बॅग चोरीस गेली. त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, नोकरी रुजू होण्याचे पत्र, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, आदी कागदपत्रे होती.
दरम्यान, अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असूनही चोरट्याने बॅरेकमध्ये प्रवेश मिळवून ही चोरी केली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार बापू रोटे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.