लोणी काळभोर: पुणे शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आलेली आहे. तर रात्री अकरा नंतर वाहनांना शहरात जाण्यासाठी प्रवेश देण्यात येतो. मात्र, पुण्यातील ही वाहतूक कोंडी प्रशासनाने पुणे-सोलापूर महामार्गाच्या माथी मारल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरील कवडीपाट (कदमवाकवस्ती, ता. हवेली) येथे अवजड वाहनांना बंदी घातल्याने गेल्या दोन दिवसांपासून वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी म्हणायची वेळ नागरिकांवर आलेली आहे.
पुणे शहरात होणारे अपघात व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने रात्री अकरानंतर अवजड वाहनांना शहरात जाण्यासाठी परवानगी दिली आहे. पुणे शहर पोलिसांनी याबाबत वाहनचालकांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. याउलट वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कवडीपाट टोलनाक्यापासून पुढे शहरात जाणारी अवजड वाहने अडवा व त्यांना पुन्हा माघारी पाठवा, असे सांगितले आहे. वरिष्ठांनी दिलेले आदेश कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने पाळत आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कवडीपाट टोलनाक्यावर अडवून गेल्या दोन दिवसांपासून माघारी पाठवली जात आहेत. त्यामुळे कवडीपाट टोल नाका, लोणी कॉर्नर ते माळी मळ्यापर्यंत वाहनांच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीत नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत आहे.
दरम्यान, पुणे शहर हे वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले देशातील एक शहर आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ती उग्र रूप धारण करीत आहे. पुण्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग, तर 10 पेक्षा अधिक राज्यमार्ग गेले आहेत. या 5 राष्ट्रीय महामार्गांपैकी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अवस्था खूप बिकट झाली आहे. हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीत नागरिकांचा श्वास गुदमरला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही एक प्रचंड मोठी समस्या बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यात बराच वेळ जातो, आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ भांडण वाढतात, वाहन चालकांची चिडचिड वाढते, वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण देखील वाढते. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांचा पुणे प्राईम न्यूजने केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातील? वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार का? हे पाहणेही आता महत्वाचे ठरणार आहे.
वाहतूक कोंडी कमी होऊ शकते?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा हा एक मोठा चौक आहे. या चौकातून लोणीकंदच्या दिशेने पुढे पुणे-नगर रस्त्याला जाता येते. या ठिकाणी जर अवजड वाहने अडवली अथवा येथून वाहने लोणीकंदच्या मार्गाने वळवली, तर सदर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, जर ही वाहने कवडीपाट टोलनाक्यावर अडवली जाणार असतील, तर पुन्हा महामार्गावर दोन्ही बाजूला 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागणार, हे मात्र 100 टक्के खरे ठरणार आहे.
दिवसभर कबाडकष्ट करून दमलेले कामगार व नोकरदार वर्ग घरी पोहोचण्यासाठी घाई करीत असतो. मात्र, पुणे शहर पोलिसांच्या या नवीन नियमामुळे कवडीपाट टोल नाक्यावर अवजड वाहने अडवली जातात. त्यामुळे अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी पोहचण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी रोखण्यासाठी या अगोदरच अवजड वाहनांची सोय करावी. तसेच याबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून दाद मागणार आहे.
दिलीप वाल्हेकर (सदस्य- जिल्हा नियोजन समिती पुणे)
अवजड वाहनांमुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच अवजड वाहनांमुळे एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते. त्यामुळे अवजड वाहनांना दिवसा बंदी घातली आहे, तर रात्री अकरा नंतर प्रवेश दिला जात आहे. याची 15 ते 20 दिवसांपासून सर्वांना कल्पना दिली आहे. जिल्हा ग्रामीण पोलिसांनाही शहरात अवजड वाहनांना बंदी घातली आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीसही अवजड वाहने शहरात सोडणार नाहीत. थेऊर फाट्यापासून वाहने वळवून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे कवडीपाट टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होणार नाही.
अमोल झेंडे (पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग पुणे)