पुणे: जम्मू काश्मीर येथील पहलगाम घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर ठिकाणचे अनेक प्रवासी अडकलेले असून महाराष्ट्रातील अडकलेल्या ८३ प्रवाशांसाठी विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आमदार राहुल कुल यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.
दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटक सध्या जम्मू – काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या परिवारांमध्ये चिंतेचं वातावरण असून, त्यांना सुरक्षितरित्या परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जम्मू – काश्मीर प्रशासन व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा व आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती आमदार कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केली होती.
काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली. या तातडीच्या निर्णयामुळे ८३ नागरिक सुखरूपपणे मुंबईत परत येऊ शकणार आहेत.
८३ पैकी ७१ नागरिक हे दौंड व हवेली तालुक्यातील असून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहकार्यामुळे आणि तत्परतेमुळे हे शक्य झाले असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.