वार्ताहर: सोमाटणे
शिरगाव, ता.२८: राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वाढीव २० टक्के अनुदान न मिळाल्याने तसेच सन २०२४- २५ च्या संच मान्यता न मिळाल्याने शिक्षक समन्वयक संघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर १४ एप्रिल पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक समन्वय संघाचे के पी पाटील व दीपक कुलकर्णी यांनी दिली आहे. शासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ६७ हजार शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वाढीव २० टक्के अनुदान १ जून २०२४ पासून देण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. परंतु अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
राज्यातील विनाअनुदान व अंशतः अनुदानित शाळेतील ६७ हजार शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी हे तुटपुंज्या वेतनावर काम करत असल्याने तत्कालीन सरकारने शिक्षकांच्या या न्याय हक्काच्या मागण्यांची दखल घेत १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ६७ हजार शिक्षक – शिक्षकेतर पदांना वाढीव न्याय देण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर करत १४ ऑक्टोबर २०२४ ला या मागण्यांचा शासननिर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. तसेच या मागण्यांचा अंमल व्हावा याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी तसे आदेश देखील शासनाने आयुक्तांकडे दिले आहे.
परंतु या शासननिर्णयाचे अद्यापही शिक्षण आयुक्त स्तरावरून अनुपालन झालेले नसून राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वाढीव २० टक्के मिळण्याची चातकासारखी वाट पाहत आहे.
प्रमुख मागण्या
१) सन २०२४-२५ ची संचमान्यतेचे तात्काळ वितरण करणे
२) शासननिर्णय १४ ऑक्टोबर २०२४ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या टप्पावाढ आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी.
वरील मागण्यांची १२ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्तता न झाल्यास १४ एप्रिल २०२५ पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी शिक्षक समन्वय संघाचे प्रा.राहुल कांबळे, के.पी.पाटील, प्रा.दिपक कुलकर्णी, प्रा.संतोष वाघ, प्रा.चंद्रकांत बागणे, प्रा.रत्नाकर माळी आदी उपस्थित होते.