पुणे : एप्रिल महिना सुरू झाला की ग्रामीण भागातील गृहिणींना काळजी लागते ती घरातील मसाला हळद, कांदा-लसूण- खोबऱ्याच्या साठवणुकीची. त्यातच बहुतांश महिला वर्षभर पुरेल एवढा मसाला व हळदीची साठवणूक करून ठेवतात. मात्र यावर्षी सर्वच पदार्थांची भाववाढ झाली आहे. मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
महाराष्ट्रात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मध्य प्रदेशमधून लाल मिर्ची येते. मसाल्यासाठी लागणारी मिरची धुळे, नंदूरबार, जळगाव या प्रमुख तीन जिल्ह्यातून येते. काश्मिरी मिरचीचेही भाव वाढले आहेत. यावर्षी मिरचीचे भाव २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत. मसाल्यासाठीच्या लाल मिरचीतच पाटाया मिरचीला अधिक महत्त्व असल्याचे विक्रेते सांगतात. लाल मिरची विकत घेऊन मसाला केल्यानंतर हा मसाला गृहिणी वर्षभर पुरवितात. ग्रामीण भागात प्रत्येक घरी वर्षाकाठी सरासरी ८ ते १० किलो मसाला बनवला जातो. लग्नसराईत घरचा मसाला असेल तर जेवणाला वेगळी चव असते. गेल्या काही महिन्यांपासून महागाईत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कौटुंबिक खर्चाची जुळवाजुळव करताना महिलांची दमछाक होत आहे.
बेडगी मिरचीसुद्धा खातेय भाव
बाजारात उपलब्ध विविध मिरचीचे भाव किलोमागे २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर अजून काही दिवसानंतर हेच दर ३०० ते ४०० रुपये पार जाण्याची शक्यता आहे. यामुळे मसाल्यासाठी लागणारी लाल मिरची तिखट झाल्याची प्रतिक्रिया गृहिणीकडून व्यक्त होत आहे. खवय्यांना चटकदार खाण्यासाठी जेवणात लागणारी मसाल्यासाठीची लाल मिरची बाजारात दाखल झाली आहे. लाल मिरचीचे २० पेक्षा अधिक प्रकार ग्राहकांना पाहायला मिळतात. सध्या चवीसाठी लागणाऱ्या बेडगी मिरचीला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.