यवत, ता. ८ : दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे उभी असलेली भाजीपाला वाहतूक करणारी पिकअप गाडी मध्यरात्री पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी एका संशयितासह अज्ञात इसमाविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिकअप मालकाने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेश थोरात (रा. माळशिरस, ता. पुरंदर) आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे महिंद्रा पिकअप (एमएच ४२ बीएफ ७३५६) ही गाडी असून, विकास राजेंद्र जाधव (रा. बोरीभडक, ता. दौंड) हा चालक म्हणून काम करतो. तो दररोज यवत येथून भाजीपाला घेऊन पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये वाहतूक करत असे. दि. २९ मे रोजी विकास जाधव हा भाजीपाला घेऊन पुण्यात गेला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने मालकाला आपण घरी परतल्याची माहिती दिली. मात्र, पहाटे दोनच्या सुमारास त्याचा घाबरलेल्या अवस्थेतील फोन आला. “आपली पिकअप गाडी पेटली आहे, तातडीने या,” असे त्याने सांगितले.
त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक बोरीभडक येथे पोहोचले असता, विकास जाधव आणि त्याच्या कुटुंबीयांनी पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले होते. सुरुवातीला विकास जाधव याने गाडीला आग कशी लागली याची माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, नंतर विश्वासात घेतल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासा केला. दि. ३० मे रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास घराबाहेर आवाज आल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता, जितेश थोरात आणि त्याच्यासोबत एक अज्ञात व्यक्ती पिकअपजवळ उभी असल्याचे दिसले. दोघांच्या हातात बिस्लरीच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल होते.
आरोपीनं पिकअपच्या काचा फोडून केबिनमध्ये डिझेल टाकले, तर साथीदाराने मागील भागातील क्रेटवर पेट्रोल ओतले. त्यानंतर जितेश थोरात याने काडीपेटीने आग लावून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याचे चालकाने सांगितले. या आगीत पिकअपचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे दोन लाख रुपयांची हानी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, यवत पोलिसांनी जितेश थोरात आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध मालमत्तेचे नुकसान, जाळपोळ आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







