यवत: जनाई शिरसाई व पुरंदर उपसा योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्या, अशा सूचना आमदार राहुल कुल यांनी पुणे पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. जनाई शिरसाई व पुरंदर उपसा पाणी नियोजनासह विविध विषयांबाबत आमदार राहुल कुल यांनी बैठक घेतली. यावेळी पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता सुहास साळुंके, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता प्रकाश धुमाळ उपस्थित होते.
या बैठकीत जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, समाविष्ट परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव, नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या तलावाचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे. पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पुढील महिन्याच्या आत सर्वेक्षण पूर्ण करावे, नव्याने समाविष्ट करायचे तलाव समाविष्ट करून जास्तीत जास्त वंचित भागाला पाणी देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनाई शिरसाई व पुरंदर उपसा या दोन्ही योजनांचे सर्वेक्षण करीत असताना येणाऱ्या सर्व अडचणी समजून घ्याव्यात. तलाव भरण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपयोजनाबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, तसेच दोन्ही योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आमदार राहुल कुल यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
जनाई शिरसाई योजनेच्या लाभार्थ्यांशी आमदार कुल यांची चर्चा
जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत सुमारे ४३८.४८ कोटी रुपयांच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेच्या लाभार्थी असलेल्या जिरेगाव, वासुंदे, कौठडी हिंगणीगाडा, पांढरेवाडी, रोटी, पडवी, कुसेगाव, देऊळगाव गाडा, खोर आदी गावातील शेतकरी व नागरिकांची आज (दि. २७) यवत येथे आमदार राहुल कुल यांनी बैठक घेऊन चर्चा केली. जनाई- शिरसाई योजना सुधारित करुन बंदिस्त पाईपलाईनने केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीबचत होऊन आपल्या तालुक्यातील अधिक क्षेत्राला लाभ होणार, असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी यावेळी दिली .