पुणे: देशभर भेसूर स्वरूप प्राप्त केलेल्या सायबर क्राईमचा कोथरुडमधील उद्योजक लक्ष्मण शिंदे बळी ठरल्याचे स्पष्ट झाले असून, अवघ्या लाखभर रुपयांसाठी पाटण्यातील सायबर भामट्यांच्या टोळीने त्यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती प्राथमिक पोलीस तपासात पुढे आली आहे. पाटणा पोलिसांनी यासंदर्भात एका युवतीसह सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून या स्वरूपाचे काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
उद्योजक शिंदे यांचा बिहारमधील घोसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शुक्रवारी (दि. ११) निर्घृण खून करण्यात आला. भंगार मालाचे १०० कोटींचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांच्या या टोळीने त्यांना जाळ्यात ओढले. या व्यवहारातून आकर्षक नफा मिळवण्याच्या उद्देशाने शिंदे पाटण्याला गेले व त्यांचा घात झाला. शिंदे यांचे पार्थिव मंगळवारी (दि.१५) सायंकाळी विमानाने पाटण्याहून पुण्याला आणण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी सामाजिक, राजकीय व उद्योगक्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे यांच्या हत्येसंदर्भात पाटणा विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील पोलिसांनी वेगवान तपास करून सहा जणांच्या टोळीला अटक केली. मुन्ना पटेल ऊर्फ रंजित ऊर्फ शिवराज अरविंदप्रसाद सागी (३७, रा. रहिमचक, जि. नालंदा), विपत्रकुमार लालदेव सिंह (३५, रा. जंदाहा, जि. वैशाली), लालबिहारी उदावसेन प्रसाद (२५, रा. हिलसा, नालंदा), विकासकुमार ऊर्फ मोहित मनोज यादव (२५, रा. नुरुसराय, नालंदा), कुंदनकुमार अरुण यादव (२१, रा. चेरो, जि. नालंदा), संगीताकुमारी उमेशप्रसाद (१९, रा. बेन, जि. नालंदा) ही आरोपींची नावे आहेत. तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याकडून एक सँट्रो कार, एक स्कॉर्पिओ, एक आयफोन, पाच स्मार्टफोन, एक टॅब व एक बटणाचा मोबाईल जप्त करण्यात आला, अशी माहिती पाटना विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार शर्मा यांनी दिली.
शिंदे १९९३च्या सीओईपीच्या बॅचचे अभियंता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत स्वतःचा कारखाना सुरू केला. त्यानंतर मोठ्या कष्टाने त्यांनी खेड शिवापूरजवळील कासुर्डीमध्ये रत्नदीप कास्टिंग या नावाने मोठा कारखाना उभारला. या कारखान्याच्या कामामध्ये ते अहोरात्र व्यस्त असत. त्यांची काही दिवसांपूर्वी बिहारमधील कथित उद्योजकांशी ओळख झाली. त्यांनी शिंदे यांना झारखंडमधील कोल इंडियाच्या मालमत्तेच्या १०० कोटींच्या भंगाराचे टेंडर देण्याचे आमिष दाखवले. या व्यवहारात चांगला नफा मिळेल, या उद्देशाने शिंदे त्यांच्या संपर्कात होते. ई-मेल व मोबाईलवरून झालेल्या संपर्कानंतर भामट्यांनी त्यांना प्लांट दाखवण्याच्या बहाण्याने बिहारमध्ये बोलावले होते.
दरम्यान, कोथरूड पोलिसांनी पाटणा पोलिसांशी संपर्क साधून शिंदे बेपत्ता झाल्याचे कळवले. त्यानंतर, पाटणा, नालंदा व गया या पोलीस ठाण्यांच्या पथकांनी शिंदे यांचा शोध सुरू केला. पाटण्याजवळील जेहानाबादमधील घोसी पोलीस ठाण्याच्या परिसरात शनिवारी (दि. १२) एक अनोळखी मृतदेह पोलिसांना आढळला. तपासाअंती तो मृतदेह शिंदे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, पाटणा पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात सायबर भामट्यांच्या टोळीने पद्धतशीर कट रचून ही हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. या टोळीने या स्वरूपाचे अनेक गुन्हे केले असावेत, असा पोलिसांचा अंदाज असून, त्या दृष्टीने पाटणा पोलिसांनी तपास जारी केला आहे.
कोथरूडमध्ये शोककळा….
उद्योजक शिंदे मूळचे मारुळी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) गावाचे रहिवासी.. व्यवसायानिमित्त ते गेल्या ३० वर्षांपासून कोथरुडमध्ये वास्तव्याला आहेत. पत्नी रत्नप्रभा, मुलगा अमेय व मुलगी आदिती असे हे चौकोनी कुटुंब शांत व मनमिळावू परिवार म्हणून या भागात परिचित आहे. अमेय इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून, आदिती नुकतीच एमबीए झाली आहे. शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच, या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा करुण अंत झाल्याने स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
शिंदे कसे फसले?
उच्चशिक्षित असलेले व व्यवसायाचा गाढा अनुभव पाठीशी असलेले शिंदे सायबर भामट्यांच्या आमिषाला कसे बळी पडले? हा प्रश्न त्यांच्या निकटवर्तीयांना सतावतो आहे. बिहारमधील भामटे व्यवसायाचे आमिष दाखवून बोलावून घेतात आणि एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी शिंदे एकटेच तेथे जातात, हे सहजपणे पचनी पडणारे नाही. सायबर भामट्यांच्या या जाळ्यात स्थानिक कोणी मध्यस्थी केली होती किंवा कसे? याबाबतचा उलगडा तपासातून होईल, अशी माहिती पाटणा पोलिसांनी दिली.
हनी ट्रॅप व मनी ट्रॅप
मधाळ आवाजाच्या महिलांचा वापर करून सायबर भामटे जाळ्यात ओढत असल्याचे हनी ट्रॅपचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत, त्याचबरोबर मोठ्या व्यवसायांचे, आकर्षक पगाराच्या नोकऱ्यावे, ऑनलाईन कामांचे आमिष दाखवून सायबर चोरटे ‘मनी ट्रॅप’द्वारे फसवणूक करत असल्याचे दररोज किमान दोन गुन्हे पुणे शहरात दाखल होतात. देशात या गुन्ह्यांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याची नोंद नॅशनल काईम रेकॉर्ड ब्यूरोने केली आहे.
मुंबईतील सायबर गुन्ह्याची संख्या सन २०१६ मधील २०८५ वरून २०२४ मध्ये ६४५० वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे ही शहरे महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्याची केंद्रे असून, २०२४ मध्ये एकट्या मुंबईत ५४.८३६, पुण्यांत २६,३३२ आणि ठाण्यात २३.१४८ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. २०२४ या वर्षात सायबर भामट्यांनी तब्बल ८११ कोटी रुपयांची फसवणूक केली.