दौंड(पुणे): दौंड तहसील कार्यालयाच्यावतीने 17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत यवत येथील पालखी तळ येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. याअंतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासोबतच त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करण्यात करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशीच आपल्या समस्यांबाबत लेखी स्वरुपात अर्ज सादर करावेत, असे आवाहन दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे गाव असलेले डाळिंब, मिरवडी, ताम्हणवाडी या गावांपासून दौंड शहराचे अंतर हे जवळपास ५० किलोमीटर असून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी सहज जाणे शक्य होत नाही. यामुळे अनेक नागरिकांना प्रशासनाकडे समस्या पाठवता येत नाहीत.
दौंड तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती राहणार
यवत येथील पालखी तळ येथे सोमवार दि. 17 मार्च 2025 रोजी तालुका लोकशाही दिनाचे व जागतिक ग्राहक दिनाचे आयोजन कर ण्यात आलेले आहे. सदर दिवशी दौंड तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत. सदर दिवशी आपल्या संबंधित सर्व विभागांबाबतच्या अडीअडचणी सोडविण्याचे कामकाज केले जाणार आहे, ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी आयडी तयार करून देणे, पुरवठा (शिधापत्रिका) विषयक EKYC करणे, विशेष अर्थसहाय्य योजनांबाबत EKYC करणे, आयुष्यमान भारत योजना रजिस्ट्रेशन करणे या सुविधा देखील नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
लोकशाही दिना अंतर्गत नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कामकाज केले जाणार असून दौंड तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या अडीअडचणींचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.